मुंबई | महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली ५० टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही.
प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली, आता आमच्या बहिणींना ५० टक्के सवलत, तसेच जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये वर्षांला सवलत आणि त्या सवलतींमुळे परिस्थिती अशी झाली की एसटी बस दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपये तोट्यात आहे. आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर मला असं वाटतं की एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले.